Thursday, March 12, 2015

“हवा तस्सा” लाईफ पार्टनर कसा निवडू?

सर, अहो काय करावं? समोरच्यांच्या एकतर अपेक्षा खूपच वाढलेल्या आहेत आणि मी तर आता स्थळं बघून बघून कंटाळलो आहे, तरी अजून कुठे लग्न जमतच नाहीये...वैतागलेला चिन्मय त्याच्या भावना बोलून दाखवत होता. त्यावेळी मी चिन्मयला काही उपायांच्या चार गोष्टी सांगितल्या ज्यामुळे त्याचं सुयोग्यआणि अगदी मला हवा तस्साजोडीदार निवडणं माझ्या मते सोपं झालं असावं. पण प्रश्न केवळ एका चिन्मयचा नाहीये. अशा किती तरी चिन्मय आणि चैताली आपल्याला भेटत असतात. लग्न जुळणे ही खरी समस्या आहे की हवा तस्साजोडीदार न मिळणं ही? माझ्या मते आजच्या तरुणाईला दुसरा प्रश्न जास्त सतावतो आहे आणि पर्यायाने त्यांच्या पालकांनाही!

आज शिक्षणाच्या, उत्पन्नाच्या, तंत्रज्ञानाच्या आणि त्या अनुषंगाने जीवनशैलीच्या कक्षा वेगाने विस्तारल्या आहेत आणि त्या नाकारून किंवा त्याला दोष देऊन काहीही उपयोग होणार नाहीये. गरज आहे ती ही बदलेली जीवनशैली आणि घराच्या भाषेत सांगायचं तर आजचं युगस्वीकारण्याची, त्याला सकारात्मक दृष्टीने बघण्याची मानसिकता विकसित करण्याने. आणि हो, ती अशी आपोआप होणारही नाही, आपले विचार बदलूनच होईल.

आज मुलींना उच्च-शिक्षित, लठ्ठ पगार असलेला, स्वतःचे घर/फ्लॅट असलेला आणि सहसा कुठलीही कौटुंबिक जबाबदारी नसलेला मुलगा सामान्यपणे जोडीदार म्हणून हवा असतो. मुलांना चांगली शिकलेली, नोकरी करणारी+ घर सांभाळणारी, मनमिळाऊ, वगैरे... अशी मुलगी हवी असते. अर्थात, ह्या अपेक्षा प्रातिनिधिक असून व्यक्तीनुसार त्या बदलत असतातच. ह्याच्या जोडीला पालकांच्याही काही अपेक्षा असतात. खास करून सुनेच्या बाबतीत. जास्तीत जास्त गुणसंपन्न सून त्यांना हवी असते. हे सर्व बघायलासुरु केल्यावर विचारात घेतले जाते आणि दिवस जसे-जसे पुढे जातात आणि लग्न मात्र जमत नाही तस-तशी ही अपेक्षांची यादी छोटी व्हायला लागते. मग अमुक नसेल तरी चालेल, तमुक असेल तरी चालेल अशा तडजोडी सुरु होतात. मुळात आपली वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थितीचे व्यवस्थित मूल्य ओळखता आहे तर ती अपेक्षांची यादी मोठी झालीच नसती. नव्हे, आज करीत असलेल्या तडजोडींची सुरुवातीपासून तयारी असती तर किती तरी चांगली स्थळे हातची गमावली नसती. पण उशिरा सुचलेले शहाणपण आपली फीस वसूल तर करतेच. आणि तडजोडीचे फळ (व स्थळ) पदरात टाकून जाते.

तसाच ह्या ब्लॉगच्या विषयाला अनुसरून आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आलेली स्थळे आपण किती निरखून, पारखून, तपासून घेतो ह्यावरही वैवाहिक जीवनाची बीजं रोवलेली असतात. वेळीच घेतलेली तसदी नंतरचा बराचसा त्रास कमी करते हे वेगळे सांगण्याची तशी आवश्यकता नाही पण बरेचदा आपण भावनेच्या भरात, नातेवाइकांच्या प्रभावाखाली वा दडपणापायी, कधी जास्त खोलात न जाता घाईघाईने निर्णय घेऊन टाकतो. आजच्या शहरी, खास करून पुणे, मुंबई, ठाणे ह्या भागात अशी गोष्ट अभावानेच घडते असं गैरसमज ठेवण्याचे कारण नाही आणि त्याचा कागदोपत्री पुरावा म्हणजे वैवाहिक त्रासाच्या सर्वात जास्त तक्रारी आणि घटस्फोटाचे अर्ज ह्याची संख्या वरील पुणे-मुंबई भागातून जास्त आहे. तोच प्रकार उर्वरित माहाराष्ट्रात घडतो. फरक इतकाच कि उर्वरित महाराष्ट्रात जागरूकता कमी असल्यामुळे हवा तस्साजोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य व भान तेथील तरुणाईला कमी असते. आणि असली तरी त्यांच्यातील स्वतःच्या लग्नाविषयीची भूमिका, कुटुंबामध्ये मत मांडण्यासाठी लाजण्याची (?) प्रवृत्ती इ. अ-जागरूकतेमुळे पर्यायाने त्यांना भोगावा लागणारा त्रास चुकत नाही.

त्या पुढील टप्पा म्हणजे, आलेल्या स्थळांशी वधू अथवा वराने प्रत्यक्ष किमान 2 वेळा सविस्तर बोलल्यानंतर होकाराचा निर्णय घ्यावा. पैकी प्रथम बोलणी फोनवर करण्यासही हरकत नाही. उलट ते जास्त सोयीचे आहे जेणेकरून इतर सर्वांचा वेळ व श्रम त्यामुळे वाचतील. ह्या दोन संवादांमध्ये वधू-वरांनी आपली कौटुंबिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती ह्याची योग्य ति सर्व माहिती समोरच्याला द्यावी आणि न-लाजता/न-घाबरता त्याचीही ही सर्व माहिती विचारून घ्यावी. ह्या माहितीमध्ये, सांगण्यामध्ये काही विसंगती, संशयास्पद किंवा अवास्तव बाब आढळल्यास त्याची योग्य प्रकारे शहानिशा कारून घ्यावी. त्याचा मार्ग ज्याने-त्याने परिस्थिती पाहून ठरवावा. लग्नानंतर होणाऱ्या संभाव्य त्रासापासून स्वतः व कुटुंबाला मुक्त करण्यासाठी सुरुवातीलाच ही घेतलेली तसदी नक्कीच फायदा देऊन जाते आणि वैवाहिक जीवन उजळ व समाधानी करण्यात साहाय्यभूत होते.

उदा. आपल्या मुलाला CBSE व्यवस्थेच्या शाळेत घालावे कि state boardच्या ह्या साध्या विषयावर एकमत नसलेली जोडपी विवादांचा वारसा मुलांना देत असताना बघायला मिळते. ह्याचे मूळ कारण हेच कि लग्न ठरण्यापुर्वी एकमेकांच्या विचारांची, जीवनशैलीची आणि भविष्याबाबत मतांची स्पष्ट कल्पना जोडीदाराला न देणे किंवा त्याचे महत्त्व न जाणणे. अशा प्रकारचे छोटे छोटे वाद मोठे स्वरूप कधी घेतात आणि ते प्रत्येक बाबतीत कधी घडायला लागतात हे त्या दोघांनाही समजत नाही. मुळात असा विवाहपूर्व संवाद साधणे म्हणजे माझ्या अटी अशा आहेत...असे सांगणे अजिबातच नव्हे तर त्या व्यक्तीला आणि त्याच्या एकंदर परिस्थितीला जाणून घेणे. त्या माहितीची आपल्या अपेक्षांशी तपासणी करणे, जुळवणूक करणे होय. आणि ती जर शक्य नसेल किंवा वेगळी असेल तर सौजन्यपूर्वक तसे कळविणे.


अर्थातच ह्या सर्व गोष्टींचा विचार करता अगदी हवा तस्साजोडीदार मिळणे ही तशी वास्तविकत: अवघडशी गोष्ट बऱ्याच अंशी सोप्पी होईल आणि पर्यायाने आपलं माणूससोबत असल्याने पुढील वैवाहिक जीवनही...!

सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी....
आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com



ग्राहक सेवा क्रमांक-  98 60 68 29 67





आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा :
https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

No comments:

Post a Comment