Tuesday, March 31, 2015

“हल्ली मुलीच मिळत नाही हो?” सत्य किती आणि वास्तव काय?

काही वर्षांपूर्वी पुण्यात सावित्रीबाई फुले ह्यांनी अपार मेहनतीने मुलींसाठीची पहिली शाळा सुरु करून स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करणाऱ्या झाडाची बीजं पेरली. त्यांचा स्वागतार्ह प्रयत्नांना चांगली फळं आली आहेत. आज त्या बीजांचा वृक्षच नाही तर वटवृक्ष तयार झाला आहे आणि आज उच्चविद्या विभूषित मुली म्हणजे सावित्रीबाईंना खरी आदरांजली आहे. पण त्यानंतर अपेक्षित होता तो केवळ तांत्रिक बदल नव्हे तर मुलींची, त्यांच्या पालकांची आणि पर्यायाने समाजाची मानसिकता बदलणे आणि सुधारणे.

आज आम्ही विवाहसंस्थेत नावनोंदणी करताना मुलींच्या जोडीदाराविषयी अपेक्षांचा अभ्यास करतो आणि लक्षात येते की मुली 
१) लग्नाच्या बाजारात आपली “व्हॅल्यू” वाढविण्याकरिता मोठ्या पदव्या घेतात म्हणजे चांगले स्थळ मिळेल, ह्यातील 60% हून अधिक मुली लग्नानंतर गृहिणींचे काम करतात 

२) मोठ्या शहरातील उच्च शिक्षित मुली लग्नानंतर नोकरी करतात त्यापैकी केवळ 20% मुली ह्या कुटुंबाची आर्थिक गरज म्हणून इतर मुली ह्या ‘आपल्या मनाप्रमाणे खर्च’ करण्यासाठी कमवित्या होतात.

मूळ प्रश्न असा आहे की मुली उच्च शिक्षण घेऊन आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे असं विचार करतात पण – “गरज पडली तर!!” ह्या मुख्य अटीवर. आणि आजही मुली ह्या -आपण जरी खूप शिकलेलो असलो तरी आपला नवरा आपल्यापेक्षाही जास्त शिकलेला असावा, आपल्यापेक्षाही जास्त पगार असणारा हवा हीच मानसिकता मनात बाळगून जगतात. म्हणजे काय? तर पुरुष हाच कुटुंबप्रमुख असावा, त्याने जास्त कमाई करावी, त्याचेच शिक्षण जास्त असावे इत्यादी इत्यादी. ह्याच अपेक्षांनुसार मुलींचे आणि त्यांच्या पालकांचे लग्नासाठी ‘वर-संशोधन’ चालू असते. उदाहरणार्थ – साधारण शहरातील मुली/पालक मोठ्या शहरातील मुलगा बघतात; नाशिक, नगर, औरंगाबाद, कोल्हापूर येथील सुशिक्षित मुलींना ‘पुण्यातीलच’ (त्यातही शक्यतो इंजिनियर/IT मधील) मुलगा हवा असतो आणि पुण्या-मुंबईतील उच्च शिक्षित मुली तर मुलगा बघायला लागण्यापूर्वीच आपला “पासपोर्ट” तयार ठेवतात. म्हणजे पुन्हा मानसिकता तीच! आपला पती आपल्यापेक्षाही जास्त शिकलेला असावा, आपल्यापेक्षाही जास्त पगार असणारा आणि आपल्यापेक्षा सर्वार्थाने “उच्च” असावा.

आणि त्याहून गंमत म्हणजे ह्यातील सर्वच मुली उच्च-शिक्षित असतात असं नाही तरीही विभागानुसार वर म्हटल्याप्रमाणे अपेक्षा तीच! परवा नाशिकमधील एक सदगृहस्थ आपल्या मुलीसाठी मुलगा बघत होते आणि त्यांनाही रीतीप्रमाणे ‘पुण्यातील’, ‘इंजिनियर’, ‘चांगलं पॅकेज असलेला’ वगैरे मुलगा हवा होता. मी सहजच त्यांचा फॉर्म बघितला आणि विचारले मुलीचं शिक्षण काय झालंय तर BA चे (MBA नव्हे) 2 विषय फक्त (?) राहिलेत म्हणाले. म्हणजे मुलगा ‘असाच’ हवा म्हणणाऱ्या मुली व पालकांनी थोडी आपली योग्यताही तपासायला हवी.  

अर्थात, प्रत्येक केसमध्ये असाच प्रकार होतो असे नाही परंतु सर्व काही होऊन मानसिकता मात्र तीच राहते आणि त्यामुळे लग्नाला उशीर होणे, मुल उशिरा होणे, वगैरे गोष्टी क्रमप्राप्तच असते. नंतर लग्न लवकर जमतच नाही म्हटल्यावर बऱ्याच मुलींच्या/पालकांच्या  अपेक्षा जमिनीवर येतात आणि मग ‘ठीक आहे असाही चालेल..तसाही चालेल’ अशा तडजोडी  सुरु होतात. दुर्दैवाने तोपर्यंत बरीच उत्तम स्थळं हातून सुटलेली असतात.

इकडे वर-पक्ष (इंजिनियर वा ITत नसलेला) हल्ली मुलींचं प्रमाणच कमी झालंय, मुलीच मिळत नाहीत वगैरे सांगत असतात. प्रत्यक्ष सत्य काय आहे? मुलींचं प्रमाण कमी झालंय? अजिबातच नाही. संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार करता दर हजार पुरुषांमागे 900हून अधिक स्रिया आहेत. मुळात मुलींचं प्रमाण कमी झालेलं नाही त्यांच्या अपेक्षांचं हवेत जाण्याचं प्रमाण मात्र वाढलंय. 

एक साधारण सर्वे केला तर ह्या उच्चशिक्षित मुली लग्नानंतर पुरुषाच्या बरोबरीने कुटुंबाचा आर्थिक बोजा उचलतात – केवळ ‘गरज असतील तेवढ्याच’! 
इतर किती उच्चशिक्षित मुली, आपण इतके  उच्चशिक्षित  आहोत तर मुलांना ट्युशनची गरज नाही असे म्हणतात? अगदीच मोजक्या! म्हणजे ह्यांच्या पदव्यांचा मुलांना शिकविण्यासाठीही संपूर्ण उपयोग नाही. 
बरं इतर किती उच्चशिक्षित मुली लग्नानंतर जरी नोकरी/व्यवसाय करीत नसल्या तरी इतर सर्व आर्थिक बाबींची एकहाती जबाबदारी घेतात (गुंतवणूक, कर्जे, विमा, बँकव्यवहार इ.)? पुन्हा अगदी मोजक्याच!

मग आता विचार करण्याची वेळ आली आहे विवाहेच्छुक मुली व त्यांच्या पालकांची की आपल्या अपेक्षा गगनाएवढ्या उंच करण्यापूर्वी आपली योग्यता, कुटुंबासाठीची उपयुक्तता नीट तपासून बघण्याची. अन्यथा नंतर तडजोड करून मुली स्वतःचे, पालक आपल्या मुलींचे एका अर्थाने नुकसानच करीत नाहीत का? पण लक्षात कोण घेतो? 

परवा अशाच एक वयस्कर बाई आपल्या इंजिनियर-नसलेल्या मुलाच्या बाबतीत चिंतीत होत्या. मी त्यांना वास्तविकता समजावून सांगून धीर दिला की – मुली 25-26 वर्षांच्या असताना ‘इंजिनियर’ची वाट बघतात, 28-29 वर्षे झाले की मग डिप्लोमावालाही चालतो, 30-32 वर्षे झाली की कुठलाही बरा कमावता पोस्ट-ग्रॅज्यूएट चालतो त्यामुळे तुम्ही चिंतीत होऊ नका.

मुलींची संख्या कमीही झालेली नाही, मुली मिळत नाही असेही नाही; फक्त वाट बघावी लागते वधू-पक्षाच्या अ-वास्तव अपेक्षा जमिनीवर येण्याची!

धन्यवाद!!!


सुयोग्य जोडीदाराची निवड, विवाहविषयक मार्गदर्शन ह्यासाठी

आजच नाव नोंदवा : www.apalamanus.com

आमचा ब्लॉग वाचा : http://apalamanusvivahsanstha.blogspot.in/

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/apalamanusvivahsanstha

गुगल ग्रुप जॉईन करा : https://groups.google.com/forum/#!forum/apalamanus

No comments:

Post a Comment